अणसुरे गावात खाडीकिनारी, शेवडीवाडी आणि वाडेकरवाडी यांच्या मधल्या भागातल्या मळ्याला ‘आखेरं’ असे म्हणतात. या आखेऱ्यात दरवर्षी पावसाळा संपल्यावर कडधान्यांची शेती केली जाते. या कडधान्यशेतीला गावात आणि कोकणात सर्वसाधारणपणे ‘गिमवस’ असे म्हणतात. संपूर्ण अणसुरे गावात कडधान्याची शेती मोठ्या प्रमाणावर होणारे हे एकमेव ठिकाण आहे. बाकी कुठेही एवढा गिमवस अलीकडे केला जात नाही. भातकापणी झाल्यानंतर जमीन एकदा नांगरली जाते व त्यानंतर कडधान्यांची पेरणी केली जाते. या गिमवसात कुळीथ आणि चवळी हे मुख्य पीक असून त्याजोडीने मध्येमध्ये कडवा आणि उडीद अल्प प्रमाणात घेतला जातो. चवळीच्या जाड आणि बारीक अशा दोन जाती पिकवल्या जातात. जमिनीच्या नुसत्या ओलाव्यावर ही पिके होतात. पिके तयार होण्याचा कालावधी दोन ते तीन महिने असतो. फेब्रुवारी-मार्चच्या सुमारास सर्वप्रथम कुळीथ काढणी होते आणि मागाहून चवळी व इतर पिकांची काढणी होते. चवळीच्या पाल्याची शेतकरी लोक भाजी करतात. चवळीच्या कोवळ्या शेंगाही आवडीने खाल्ल्या जातात. दाणे काढल्यावर उरलेल्या टरफलांना ‘गुळी’ असे म्हणतात व तो गुरांना पौष्टिक खाद्य म्हणून उपयोगी येतो. अन्नधान्याची घरगुती गरज भागवण्यासाठी हा गिमवस केला जातो. व्यावसायिक तत्त्वावर केला जात नाही. वाडेकरवाडी, शेवडीवाडी, शेरीवाडी इथले लोक हा गिमवस करण्यात सहभागी असतात. या दिवसांत संपूर्ण आखेऱ्याचा मळा हिरवागार झालेला दिसतो. या माळ्याच्या खालच्या भागात फक्त गिमवस होतो. मातीला नायट्रोजनाचा पुरवठा होऊन मातीची सुपीकता वाढवण्यात कडधान्य शेतीचा मोठा वाटा आहे.